मृत्यूकार विनोद अहिरे यांच्या शब्दांची गर्दी ही अंगावरची वर्दी या कवितेला मिळाला प्रचंड प्रतिसाद
नुकतेच अहमदनगर येथे विद्रोही साहित्य मंचातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सा निमित्त 'भारत माझा देश आहे' या शीर्षकाखाली राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कवी संमेलनाचे अध्यक्ष जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले साहित्यिक, कवी, समीक्षक मृत्यूकार विनोद अहिरे(Vinod Ahire Jalgaon) यांची एकमुखी निवड करण्यात आलेली होती. कवी संमेलनामध्ये चित्रपट अभिनेते, गीतकार श्री बाबासाहेब सौदागर, हृदय मानव अशोक, सुभाष सोनवणे यासारख्या अनेक ख्यातमान कविंनी हजेरी लावली होती. विनोद अहिरे यांनी कवी संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून 'ही लेखणी नाही तर शस्त्र आहे' तसेच 'राखतो मी ताज' या दोन कवितांना प्रचंड प्रतिसाद रसिक श्रोत्यांचा मिळाला.
विनोद अहिरे यांनी सादर केलेल्या कविता.
ही लेखणी नाही शास्त्र आहे
बाबा तुम्ही माझ्या
हातात लेखणी देऊन
माझ्या अंतरंगातील
निद्रिस्त ज्वालामुखीला
जागृत केलंय
तो शब्द रूपाने
ऊसंड्या घेऊन
आता बाहेर येत आहे.
ही शब्दांची गर्दी
ही अंगावरची वर्दी
सारकाही तुमचंच आहे.
ही लेखणी
कधी महाराजांची
तलवार होते
कधी विद्रोहाची
मशाल होते
कधी संविधानातून
शब्द घेते
कधी देशद्रोह्यांचे
कंठ फोडते
कधी समाजकंटकांच्या पोटात
खचकन घुसते
तर..
कधी बुद्धांची अहिंसा
होते
या तुमच्या लेखणीतील
शाहीचा टिळा
मस्तकी लावून
या प्रतिकूल परिस्थितीतही
यशस्वी मार्गक्रमण
करीत आहे बाबा....
ही लेखणी नाही
तर शस्त्र आहे
स्वाभिमानाने जगण्याचं
राखतो मी ताज
शत्रु दृश्य असो वा अदृश्य
उसळू दे कितीही लाटा
मी तुडवत जाईल
त्या मरणाच्या वाटा
किती येऊ दे आतंकवादी
येऊ दे विषाणूंच्या जाती
असेल उभा मी
निधड्या छातीने
लावून कपाळी
या भूमातेची माती
वादळ वारा पाऊस धारा
डोळ्यात आमुच्या कर्तव्याचा निखारा
अशोक हेमंत विजय ओंबळे
रक्ताने भिजला सागरी किनारा
मातीच्या कणाकणातून
खाकीचा निरांजनातून
दीप उजळले नवे
खाकीचा गर्भातून जन्मले तुफानातील दिवे तुफानातील दिवे
येतील संकट जातील संकट
भीती ना आम्हा शिवे
खाकीचा गर्भातून जन्मले तुफानातील दिवे तुफानातील दिवे
हिमालयाच्या चट्टांनावर
उभा तो सैनिक
काढून धैर्याची छाती
सह्याद्रीच्या कडेकपारीत
पेटत आहे
खाकीच्या शौर्याच्या वाती
सिंधू च्या त्या जल लहरीवर
तरंगत आहे शहीदांच्या गाथा
गोदेच्या तीरावर
उभा मी घेऊनी रक्तबंबाळ माथा
शिंपण करूनी रक्ताचे
भूमातेचे धुतलेस तू चरण
हास्य वदने देऊनी
तुकाराम(ओंबळे)स्वीकारे मरण
भूमातेच्या शत्रुचा तू
उतरविलास माज
छातीवरती गोळ्या झेलुनी
सागर किनारी राखतो मी ताज
राखतो मी ताज
विनोद अहिरे यांच्या या कवितांना प्रचंड दाद मिळाली.

Post a Comment