शाळेच्या निष्काळजीपणामुळे दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; भडगाव शहर हळहळले
भडगाव दि. 16[ प्रतिनिधी] सुभाष ठाकरे. येथील आदर्श कन्या शाळेच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. नर्सरीमध्ये शिक्षण घेत असलेली दोन चिमुकली बालके शाळेच्या आवारातील संरक्षण भिंतीवरून घसरून थेट नाल्यात पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकांपैकी अंश सागर तहसीलदार, वय ३ वर्षे ६ महिने, रा. आदर्श कॉलनी, भडगाव, तर दुसरा बालक मयंक ज्ञानेश्वर वाघ, वय ४ वर्षे २ महिने, रा. बालाजी गल्ली, भडगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही बालके नाल्यात पडून बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शाळेच्या संरक्षण भिंतीला कोणताही अडोका, जाळी अथवा सुरक्षित व्यवस्था नसल्यामुळे ही दुर्घटना घडली. इतक्या लहान वयाच्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर जाण्याची परवानगी कशी देण्यात आली? त्या वेळी शिक्षक व कर्मचारी कुठे होते? विद्यार्थ्यांवर योग्य देखरेख का ठेवली गेली नाही? असे अनेक गंभीर प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.
या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच पालक, नातेवाईक व नागरिकांनी शाळेत धाव घेतली. परिसरात शोक व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. निष्पाप दोन जीव केवळ शाळेच्या हलगर्जीपणामुळे गमावले गेल्याचा आरोप पालक व नागरिकांकडून केला जात आहे.
सदर प्रकरणी संबंधित शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक व जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शाळांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना सक्तीने राबवाव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
Post a Comment