जळगावात अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग; महामार्गावरील कारवाई तीव्र.
जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग आला असून गेल्या पंधरा दिवसांपासून ही कारवाई सातत्याने सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत गुरुवार, २३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपासून अतिक्रमण विभागाने राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय तंत्रनिकेतन ते मानराज पार्क या दरम्यान विशेष कारवाई राबवली.
या कारवाईदरम्यान महामार्गाच्या कडेला उभारण्यात आलेल्या आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दुकाने व टपऱ्यांवर बुलडोझर चालवण्यात आला. अनेक अतिक्रमणे हटवून साहित्य जप्त करण्यात आले. तसेच समांतर रस्त्यावर बेकायदेशीररीत्या उभ्या असलेल्या पाच वाहनांवरही कारवाई करत ती जप्त करण्यात आली.
महापालिकेच्या या कारवाईमुळे संबंधित व्यावसायिकांमध्ये काही प्रमाणात नाराजी दिसून आली, तर नागरिकांनी मात्र वाहतूक सुरळीत होण्यासाठी या उपक्रमाचे स्वागत केले. शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होत असून अपघातांची शक्यता वाढत असल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.
दरम्यान, जळगाव शहराच्या हद्दीत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व अतिक्रमणे पूर्णपणे हटवली जाईपर्यंत ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांनी स्पष्ट केले. या कारवाईमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Post a Comment